एआयचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज” कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे पत्रकारांना आवाहन

“एआयचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज” कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे पत्रकारांना आवाहन “आधुनिक पत्रकारिता” कार्यशाळेत तंत्रज्ञान, नैतिकता आणि सत्य पडताळणी यांचा समतोल राखण्यावर भर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बद्दल भीती न बाळगता ते शिकवून घ्यावे. एआयमुळे कार्यालयीन कामकाज करावयास खूप मदत होते. जवळपास सर्वच क्षेत्रात एआयची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. एआयचा वापर करतांना त्याला विचारात येणारे प्रश्न जर योग्यरीत्या विचारले तर आपणास चागल्या प्रकारची माहिती प्राप्त होते. यामुळे वेळेची बचत होते. त्यामुळे पत्रकारितेच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे प्रभावी साधन ठरत असून त्याची भीती न बाळगता ते आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहात दि.१८ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित “आधुनिक पत्रकारिता” कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीराम पवार, विशाल पाटील, फराह खान, नंदकिशोर पाटील, प्रियदर्शनी हिंगे, संतोष शाळीग्राम, डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी संयोजन केले. पत्रकारितेत माहितीवरील मक्तेदारी संपुष्टात आली असून प्रत्येक व्यक्ती कंटेंट निर्माण करू शकते, असे मत ज्येष्ठ संपादक व विचारवंत, दै.सकाळ, पुणेचे डॉ. श्रीराम पवार यांनी मांडले. अशा परिस्थितीत सत्य पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि सार्वजनिक हिताची जाणीव हेच पत्रकारांचे वैशिष्ट्य ठरते, असे त्यांनी सांगितले. वेगाच्या स्पर्धेत संवेदनशीलता आणि सत्यता अबाधित ठेवणे हीच खरी कसोटी असल्याचे त्यांनी नमूद केले. तर लोकशाही, मुंबईचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी संवाद कौशल्य, स्पष्टता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान हे केवळ सहाय्यक साधन असून पत्रकारितेचा केंद्रबिंदू नागरिकांच्या प्रश्नांवरच असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. आणि दैनिक लोकमत, छत्रपती संभाजीनगरचे संपादक नंदकिशोर पाटील यांनी पत्रकारिता ही सतत शिकत राहण्याची प्रक्रिया असल्याचे सांगत व्हायरल संस्कृतीच्या काळात संयमी आणि तथ्याधारित वृत्तांकनाची गरज अधिक असल्याचे नमूद केले. यावेळी न्यूज १८ मराठी, मुंबईच्या सहसंपादक फराह खान यांनी एआयमुळे शोध पत्रकारिता, डेटा विश्लेषण आणि तथ्य पडताळणी अधिक प्रभावी होत असल्याचे सांगितले. मात्र गोपनीयता धोक्यात येणे, सायबर गुन्हे, चुकीची माहिती आणि तंत्रज्ञानावर अति अवलंबित्व यांसारख्या बाबींविषयी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचा इशारा त्यांनी दिला. आयक्यूएसी सेलचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक यशाचा उल्लेख करत पत्रकारांनी नकारात्मक घटनांबरोबरच संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक प्रगती यांची माहितीही समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. तर मॅक्स वुमन चैनल, मुंबईच्या संचालिका प्रियदर्शनी हिंगे यांनी माध्यमांतील महिलांविषयीच्या रूढ प्रतिमांवर भाष्य करत पत्रकारितेत संवेदनशीलता आणि पूर्वग्रहविरहित दृष्टी आवश्यक असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व देणे ही माध्यमांची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आणि दै.सकाळ, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय संपादक संतोष शालिग्राम यांनी एआयमुळे बातमी करणे आता अत्यंत सोपे झाले असून, मराठी पत्रकारितेतही याचा लाभ घेता येऊ शकतो. माहितीचे संकलन, भाषांतर, बातमीचा मसुदा तयार करणे यासारख्या अनेक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करता येतात. विशेषतः चॅटजीपीटीच्या माध्यमातून पत्रकारांना विविध विषयांवरील माहिती झटपट मिळवता येते, भाषेतील अडचणी दूर करता येतात आणि बातमीला वेगवेगळे कोन देऊन सादर करता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यशाळेचा प्रारंभ झाला, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. या कार्यशाळेस विद्यापीठ परिक्षेत्रातील पत्रकारांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.