धनगरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबिराचे दिमाखदार उद्घाटन

धनगरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक युवक शिबिराचे दिमाखदार उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (विद्यापीठ परिसर) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “शाश्वत विकासासाठी युवक : जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकासावर भर” या संकल्पनेवर आधारित विशेष वार्षिक युवक शिबिराचे उद्घाटन मौजे धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर दि. ५ मार्च २०२६ ते ११ मार्च २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वच्छतादूत संत गाडगे महाराज आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) गीत आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. चंद्रकांत बाविस्कर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘डिजिटल साक्षरता ही काळाची गरज’ असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती करण्यासाठी डिजिटल साक्षर असणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी विविध दैनंदिन उदाहरणांतून उपस्थितांना समजावून सांगितले. शिबिराचे उद्घाटन धनगरवाडीचे तडफदार युवा सरपंच श्री. अमित संजय पगडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी गावच्या विकासात युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रा.से.यो. विभागाचे संचालक प्रा. डॉ. मारोती गायकवाड यांनी प्रास्ताविक केले व शिबिराच्या उद्देशावर प्रकाश टाकला. या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ५४ विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला असून, यामध्ये मुलींचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय आहे. सदर शिबिर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि प्र. कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी तथा माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. सुहास पाठक यांच्यासह डॉ. कैलाश यादव आणि डॉ. गिरीश जोंधळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजुमई राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैभव गडदे यांनी मानले. सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली. या सात दिवसांच्या शिबिरात जलसंधारण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण आणि मतदान जनजागृती यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.