
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न “विद्यार्थ्यांनी केवळ पदवीसाठी नव्हे, तर देशसेवेच्या समर्पक भावनेतून संशोधन आणि नवकल्पनांवर भर द्यावा. विज्ञानाच्या बळावरच आपण समर्थ आणि सशक्त भारत घडवू शकतो.” असे प्रतिपादन डॉ. काशीनाथ देवधर यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्या वतीने ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “विज्ञान आणि आत्मनिर्भर भारत” या विषयावर आयोजित या विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डीआरडीओ (DRDO) पुणे येथील माजी शास्त्रज्ञ आणि सुप्रसिद्ध ‘गन एक्सपर्ट’ डॉ. काशीनाथ देवधर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. देवधर यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्षेपणास्त्र क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी मालिका आणि ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांमुळे आपली ताकद वाढली आहे. शत्रूची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करणारे ‘रुद्रम’ आणि प्रगत ‘अग्नी-६’ मुळे भारत आता अधिक सुरक्षित आहे.” डॉ. देवधर यांनी आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. डॉ. कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कारगिल युद्धाच्या काळात काम करण्याची संधी मिळणे, हा आयुष्यातील अमूल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवानांच्या सुविधेसाठी ‘जी बजुका’ गनचे वजन २६ किलोवरून १४ किलोपर्यंत कमी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडले, ज्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. संरक्षण सिद्धतेवर आतापर्यंत १०३१ हून अधिक व्याख्याने देऊन त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली आहे. या प्रसंगी व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. शैलेश वाढेर, रसायनशास्त्र संकुल संचालक डॉ. संगीता माकोने, समन्वयक डॉ. अविनाश पुयड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ. ज्ञानेश्वर वानखेडे, डॉ. चैतन्या, डॉ. सुहास पाठक, डॉ. गट्टानी, डॉ. पेकमवार, डॉ. यशवंत जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. संगीता माकोने यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे डॉ. काशीनाथ देवधर यांचा विद्यापीठाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.